Saturday, November 28, 2015

बाई हा देश तुमच्यासाठी नोहेच.....

या देशात असहिष्णुतेचं वातावरण असल्याचा बोभाटा काही मोजके लोक करताहेत. साहित्यिक अरुंधती राॅय या देखिल त्यातल्याच एक. आज पुण्यात त्यांना महात्मा फुले समता पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देतानाच्या लेखी आणि तोंडी भाषणात त्यांनी जे तारे तोडले ते पाहून मनात प्रश्न आला की असं असताना मग या बाई या देशात कशासाठी राहताहेत.....
 या कार्यक्रमात त्या ज्या काही बोलल्या किंवा ओकल्या त्यातले हे काही ठळक मुद्दे - -
 - फॅसिझमच्या लाटेविरुद्ध राजकीय आघाड्या करणं आवश्यक आहे - 
- अस्पृश्यांसाठी हिंदू धर्म हा दहशतीची बंद कुपी आहे - 
 - सत्तेवर असलेलं निर्लज्जपणे म्हणतात की हे हिंदू राष्ट्र आहे...आणि ते सिद्ध करण्यासाठी - अभ्यासक्रम बदलले जाताहेत....न्यायपालिका, पोलीस खातं, गुप्तचर विभाग यांच्यात हिंदुत्वाचे भाट नेमण्यात येत आहेत.... 
 - जातीय व्यवस्था ही हिंदू संस्कृतीची महानतम देणगी आहे यावर महात्मा गांधीं यांचा विश्वास होता...त्यामुळंच त्यांनी डाँ. आंबेडकरांना पुणे करार करायला भाग पाडलं...या कराराची किंमत दलित आजही मोजताहेत.... 
 - बाजीराव मस्तानी चित्रपटाबाबत वाद निर्माण केला जायोत...पण पेशव्यांच्या राज्यात दलितांची स्थिती काय होती हे कुणी विचारणार की नाही  -
 अनिष्ट प्रथांविरुद्ध बोलणं हे देशातल्या लेखकांसाठी प्राणघातक ठरतय. विचार व्यक्त करणारांना गोळ्या घालून शांत केले जातय. पोलिसांच्या संरक्षणात आम्हाला काम करावे लागतय, अशी स्थिती असेल, तर आम्ही विचार कसा करणार?...आणि त्याचाच निषेध म्हणून पुरस्कार परत केले जाताहेत
 - देशातले उद्योग सहा टक्ंके बनिया आणि ब्राह्मणांया हातात आहेत. प्रसारमाध्यमंही बनिया आणि ब्राह्मणांच्या हातात आहेत. ही माध्यमं मुख्यतः बनिया, ब्राह्मण किंवा अन्य प्रभावशाली जातींतल्या पत्रकारांनाच नोकरीवर ठेवतात. 

खरोखरच या देशात एवढं सगळं वाईट सुरु आहे हे त्यांच्या भाषणामुळं नव्यानंच कळलं आणि त्यांना हे दिसतय म्हणजे ते खरंच असणार ना? पण आम्हाला हे काही दिसत नाही. कदाचित राॅय बाईंना दिव्यदृष्टी प्राप्त झाली असावी. असं असेल तर मग बाई हा देश आपला नोहेच असंच त्यांना उद्देशून म्हणावं लागेल.

Monday, November 9, 2015

वेलकम बॅक MAGGI


सकाळी सकाळी ट्विटरवर नजर टाकली तेव्हा विविध वृत्तसंस्थांची ट्विट येऊन पडली होती.त्यातलं ठळक ट्वीट होतं ते म्हणजे मॅगीचं भारतातलं पुनरागमन. गेले पाच महिने मॅगी दृष्टीआड झाली होती. मॅगीमध्ये शिशाचा अंश असल्याच्या संशयावरुन भारतात मॅगीवर बंदी आणण्यात आली. आता सगळ्या अग्निपरिक्षा पार पाडून मॅगी पुन्हा एकदा बाजारात येतेय. मध्यमवर्गीयांपासून उच्चवर्गापर्यंत आणि घरातल्या स्वयंपाकघरापासून ते हातगाड्यांपर्यंत अतिशय लोकप्रिय झालेली मॅगी हे मार्केटिंगचं उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. 1982 साली मॅगी सर्वप्रथम बाराजात आली. त्यावेळी मी नूतन मराठी विद्यालयात शिकत होतो. फास्ट फूटचा जमाना यायचा होता. आमच्या सारख्यांना शाळेबाहेर मिळणारा वडा पाव हेचे काय ते फास्टफूड माहित होतं. मॅगी आमच्या आयुष्यात आली तो दिवस अजूनही चांगला आठवतोय. त्या दिवशी आमच्या शाळेतल्या नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या सभागृहात एकत्र केलं गेलं होतं. मागे एकदा कोलगेटनं शाळेत टुथपेस्ट वाटल्या होत्या. त्या दिवशी मात्र वेगळीच गोष्ट हातात पडली. ती म्हणजे मॅगीचं पाकीट. बहुधा त्या काळात शाळेचे विद्यार्थी या कंपन्यांच्या प्रयोगशाळा होत्या. त्याच दिवशी सायंकाळी घरी गेल्यावर मॅगीचं पाकीट फोडलं आणि टु मिनिट््समध्ये तयार होणारा हा पदार्थ पहिल्यांचा चाखला. त्या दिवशी तोंडात मॅगीची जी चव बसली ती कधी कमी झालीच नाही. गेले पाच महिने मॅगी खायला मिळाली नव्हती. पण आज दिवाळीचा फराळ समोर असूनही मॅगीच्या आठवणीनं तोंडाला पाणी सुटलं हे मात्र खरं. नेस्टलेनं आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना हाताशी धरून केलेलं मार्केटिंग कँपेन किती यशस्वी ठरलंय हे आज समजतय. मॅगी बाजारात येण्यापूर्वी TOP RAMEN सारखे काही नूडल्स बाजारात होते म्हणतात. पण आम्हाला तेव्हा ते माहित नव्हतं. नूडल्सच्या रुपानं पहिला पदार्थ तोंडी पडला तो मॅगीच. आजही बाजारात मॅगीसारखे अनेक इंस्ट्ंट नूडल्स उपलब्ध आहेत. पण दुकानदाराकडं मागितली जाते ती मॅगीच. मुलांच्या माध्यमातून मॅगीचा भारतीय कुटुंबात शिरकाव झाला त्यानंतरच्या काळात सर्वात सुखावल्या असतील त्या मुलांच्या आया. कारण भूकेच्या वेळी आयत्यावेळी काय द्यायचं हा प्रश्नच मॅगीनं सोडवून टाकला होता. नंतरच्या काळात हेल्दी फूडची संकल्पना जोर धरु लागली तेव्हा Fast To Cook,Good To Eat असं सांगणाऱ्या मॅगीच्या उत्पादकांनी Taste Bhi, Health Bhi असा पवित्रा बदलत मॅगीला बाजारातून हलू दिलं नाही. मॅगी खरोखरच हेल्दी फूड आहे हे ठसवण्यासाठी OAT NOODLES, VEG ATTA NOODLES असंही मॅगीचं स्वरुप बदललं. नंतरच्या काळात अमिताभ बच्चन यांनी केलेल्या MERI MAGGI, 2 MINUTES ME KHUSHIYAN या जाहिरातीनंही मॅगीचं स्थान बाजारात भक्कम केलं. पण कुठेतरी काहीतरी बिघडलं आणि मॅगी बाजारातून गायब झाली. मुलं, त्यांच्या आया आणि आमच्यासारखे मॅगी प्रेमीही हिरमुसले. पण आता मॅगी आलीये. पाकिट फोडल्यांनंतरच्या पुढच्या दोन मिनिटांत वाफाळणारी मॅगी लवकरच खायला मिळणार आहे. खरंतर ही दिवाळीची भेटच म्हणायला हवी नाही?

Wednesday, November 4, 2015

आरुषीच्या निमित्तानं....
ऩाँएडामधील आरुशी हत्याप्रकरणावर पत्रकार अविरुक सेन यांनी लिहिलेलं आणि पेंग्विन प्रकाशनानं प्रकाशित केलेलं AARUSHI हे पुस्तक वाचनात आलं. केवळ चार दिवसांत हे पुस्तक हातावेगळं झालं. पण ते वाचताना निर्माण झालेली अस्वस्थता अद्यापही कमी झालेली नाही. या प्रकरणाबद्दल वृत्तपत्रांतून बरंच काही वाचलं होतं, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरचं वार्तांकनही अधून मधून पाहिलं. केवळ चौदा वर्षांच्य आरुषी तलवारचा तिच्याच राहत्या घरात, आणि ते ही तिचे आईवडील घरात असताना खून होतो आणि नंतर हेच तिचे आईवडील आपल्या मुलीच्या खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात जातात. सारंच अत्यर्क. आजवर जे काही माध्यमांतून समोर येत होतं त्यावरुन घराण्याचा सन्मान ठेवण्यासाठी आईवडिलांनी आपल्या मुलीचा खून केला असणं शक्य आहे, असंच वाटत होतं. एरव्ही पत्रकारिता करत असताना आणि विशेषतः गुन्हेगारी विषयक घटनांचं वार्तांकन करत असताना तपास यंत्रणा जे सांगतात तेच सत्य आहे त्यापलीकडे काही नाही, असं मानण्याची एक सवय लागून जाते. किंबहुना या यंत्रणांना प्रतिप्रश्न करण्याची सवय हळूहळू कमी होत जाते. पण Aarushi हे पुस्तक वाचताना अनेक प्रश्न मनात उभे राहिले. एका खून प्रकरणात एकाच तपास यंत्रणेची दोन पथकं वेगवेगळा निष्कर्ष काढतात, त्यापैकी एक पथक घरच्या नोकरांंना दोषी ठरवतं तर दुसरं पथक थेट आईवडिलांवरच दोषारोप ठेवतं आणि त्यांना तुरुंगात धाडण्यासाठी जीवाचा आटापिटाही करतं हे सारं वास्तव Aarushi मधून समोर येतं. तलवार कुटुंबियांच्या मोलकरणीपासून ते अहमदाबादच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांपर्यंतच्या साक्षिदारांच्या वारंवार बदलल्या गेलेल्या जबान्या, आरुषीच्या आईवडलांना दोषी ठरवण्याचा तपास अधिकाऱ्याचा आटापिटा, न्याययंत्रणेचा पूर्वग्रहदुषीत दृष्टीकोन, सुनावणी न्यायालयाच्या न्यायाधिशानं निवृत्तीपूर्वी हे प्रकरण संपवण्याची केलेली घाई आणि साक्षीपुरावे संपण्याच्या आधी एक महिना लिहून ठेवलेलं निकालपत्र हे सारं काही डोकं चक्रावून टाकणारं आहे. सीबीआयकडं तपास गेला की न्याय मिळतो अशी सर्वसामान्यांची भावना आहे. भ्रष्ट राजकारणी, नोकरशहा यांच्या बुजबुजाटात देशातील न्याययंत्रणा ही सामान्यांच्या मनातला एकमेव आधार आहे (आणि न्यायालयांनी ते बहुतांश वेळा सिद्धही केलं आहे). असं असताना या यंत्रणांंनी काही वेगळं वागावं हे धक्कादायक आहे. Aarushi वाचताना माझ्याही मनात हे प्रश्न आले. सेक्स, वाईफ स्वॅपिंग अशा काही गोष्टींमुळं आरुषी प्रकरणाकडं माध्यमांचे लक्ष वेधलं गेलं. आणि त्यातून Aarushi सारख्या पुस्तकांतून विचारमंथन करण्याची कल्पना अविरुक सेन यांच्यासारख्या पत्रकाराच्या मनात सुचली. पण देशात आज आणखीही अशा असंख्य आरुषी असतील की ज्या खरा न्याय मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांचं काय?.. हाच एक प्रश्न Aarushi वाचताना माझ्या मनात उभा राहिला. याचं उत्तर शोधणं हे मृगजळाच्या पाठीमागं धावण्यासारखं आहे. पण असो.जरुर वाचावं एवढ्यासाठीच हा लेखनप्रपंच