Wednesday, November 4, 2015

आरुषीच्या निमित्तानं....
ऩाँएडामधील आरुशी हत्याप्रकरणावर पत्रकार अविरुक सेन यांनी लिहिलेलं आणि पेंग्विन प्रकाशनानं प्रकाशित केलेलं AARUSHI हे पुस्तक वाचनात आलं. केवळ चार दिवसांत हे पुस्तक हातावेगळं झालं. पण ते वाचताना निर्माण झालेली अस्वस्थता अद्यापही कमी झालेली नाही. या प्रकरणाबद्दल वृत्तपत्रांतून बरंच काही वाचलं होतं, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरचं वार्तांकनही अधून मधून पाहिलं. केवळ चौदा वर्षांच्य आरुषी तलवारचा तिच्याच राहत्या घरात, आणि ते ही तिचे आईवडील घरात असताना खून होतो आणि नंतर हेच तिचे आईवडील आपल्या मुलीच्या खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात जातात. सारंच अत्यर्क. आजवर जे काही माध्यमांतून समोर येत होतं त्यावरुन घराण्याचा सन्मान ठेवण्यासाठी आईवडिलांनी आपल्या मुलीचा खून केला असणं शक्य आहे, असंच वाटत होतं. एरव्ही पत्रकारिता करत असताना आणि विशेषतः गुन्हेगारी विषयक घटनांचं वार्तांकन करत असताना तपास यंत्रणा जे सांगतात तेच सत्य आहे त्यापलीकडे काही नाही, असं मानण्याची एक सवय लागून जाते. किंबहुना या यंत्रणांना प्रतिप्रश्न करण्याची सवय हळूहळू कमी होत जाते. पण Aarushi हे पुस्तक वाचताना अनेक प्रश्न मनात उभे राहिले. एका खून प्रकरणात एकाच तपास यंत्रणेची दोन पथकं वेगवेगळा निष्कर्ष काढतात, त्यापैकी एक पथक घरच्या नोकरांंना दोषी ठरवतं तर दुसरं पथक थेट आईवडिलांवरच दोषारोप ठेवतं आणि त्यांना तुरुंगात धाडण्यासाठी जीवाचा आटापिटाही करतं हे सारं वास्तव Aarushi मधून समोर येतं. तलवार कुटुंबियांच्या मोलकरणीपासून ते अहमदाबादच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांपर्यंतच्या साक्षिदारांच्या वारंवार बदलल्या गेलेल्या जबान्या, आरुषीच्या आईवडलांना दोषी ठरवण्याचा तपास अधिकाऱ्याचा आटापिटा, न्याययंत्रणेचा पूर्वग्रहदुषीत दृष्टीकोन, सुनावणी न्यायालयाच्या न्यायाधिशानं निवृत्तीपूर्वी हे प्रकरण संपवण्याची केलेली घाई आणि साक्षीपुरावे संपण्याच्या आधी एक महिना लिहून ठेवलेलं निकालपत्र हे सारं काही डोकं चक्रावून टाकणारं आहे. सीबीआयकडं तपास गेला की न्याय मिळतो अशी सर्वसामान्यांची भावना आहे. भ्रष्ट राजकारणी, नोकरशहा यांच्या बुजबुजाटात देशातील न्याययंत्रणा ही सामान्यांच्या मनातला एकमेव आधार आहे (आणि न्यायालयांनी ते बहुतांश वेळा सिद्धही केलं आहे). असं असताना या यंत्रणांंनी काही वेगळं वागावं हे धक्कादायक आहे. Aarushi वाचताना माझ्याही मनात हे प्रश्न आले. सेक्स, वाईफ स्वॅपिंग अशा काही गोष्टींमुळं आरुषी प्रकरणाकडं माध्यमांचे लक्ष वेधलं गेलं. आणि त्यातून Aarushi सारख्या पुस्तकांतून विचारमंथन करण्याची कल्पना अविरुक सेन यांच्यासारख्या पत्रकाराच्या मनात सुचली. पण देशात आज आणखीही अशा असंख्य आरुषी असतील की ज्या खरा न्याय मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांचं काय?.. हाच एक प्रश्न Aarushi वाचताना माझ्या मनात उभा राहिला. याचं उत्तर शोधणं हे मृगजळाच्या पाठीमागं धावण्यासारखं आहे. पण असो.जरुर वाचावं एवढ्यासाठीच हा लेखनप्रपंच

No comments:

Post a Comment